अखेर राणा दाम्पत्याने मागे घेतला पवित्रा : रवी राणांची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्याला मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठविले असल्याचा आरोप करून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये यासाठी आपण आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली.

रवी राणा यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यावरील संकट दूर सराशयासाठी हनुमान चालीसा वाचावी असा आपला आग्रह होता. यानंतर आज शनिवारी आपण हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सकाळीच पोलिसांनी अटक करून घरातून बाहेर पडण्यासाठी मज्जाव केला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून आपल्यावर हल्ला केल्याचा सनसनाटी आरोप राणा यांनी केला.

रवी राणा पुढे म्हणाले की, राज्यात सध्या अराजक पसरले आहे. राज्यात पश्‍चीम बंगालसारखी स्थिती तयार झालेली आहे. आज शिवसैनिक हनुमान चालीसा वाचत असून आधीच हे का केले नाही असा प्रश्‍न त्यांनी विचारला. उद्या पंतप्रधान मोदी हे मुंबईत येत असून त्यांचा दौरा रद्द व्हावा म्हणून मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र मोदींनी राज्यात यावे, त्यांचा दौरा रद्द होऊ नये असे आपले प्रयत्न आहेत.

राणा पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. मात्र आजची शिवसेनेची भूमिका ही खूप वेगळी आहे. आगामी निवडणुकीत रामभक्त आणि हनुमानभक्त त्यांना दाखवून देतील असा इशारा आमदार राणा यांनी याप्रसंगी दिला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे कुणाच्या दबावामुळे नव्हे तर लोकांना त्रास होऊ नये यासाठी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे रवी राणा यांनी जाहीर केले.

Protected Content