कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यांचा मनसे शेतकरी सेनेतर्फे निषेध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केल्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. मनसे शेतकरी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शेतकरी हा काबाडकष्ट करून आपल्या मेहनतीने स्वतःचे आणि संपूर्ण जगाचे पोषण करणारा आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, आणि त्यांना अपमानास्पद उपमा देणे हा सरकारचा संवेदनाहीनपणा दर्शवतो.”

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून राबवण्यात आल्या. परंतु आता या योजनांवर आळा घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हमीभाव जाहीर करूनही तो शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यांचा माल बाजारात कवडीमोल भावाने खरेदी केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने योग्य उपाययोजना करायला पाहिजे, परंतु त्याऐवजी शेतकऱ्यांनाच दोष देऊन त्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवली जात आहे. मनसे शेतकरी सेनेने सरकारला इशारा दिला आहे की, कृषिमंत्र्यांनी त्वरित शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल. सरकारने शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरीच त्यांना धडा शिकवतील, असा इशारा अविनाश पाटील यांनी दिला आहे.

Protected Content