चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोंबाबोंब आंदोलन करून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील रस्त्यांची अतिशय भयंकर अवस्था झालेली आहे. अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्यांमध्ये खूप मोठे खड्डे पडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांची आंदोलनांची मालिका सुरू केली आहे. यात शुक्रवारी रयत सेना आणि मेरा गाव मेरा तीर्थ या संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, मेरा गाव मेरा तीर्थचे प्रवर्तक विजय शर्मा, खुशाल पाटील, किशोर पाटील, स्वप्नील गायकवाड, योगेश पाटील, प्रदीप मराठे, दीपक देशमुख, प्रशांत अजबे, संदीप पवार, नारायण जेठवाणी, श्री. जगताप सहभागी झाले होते. शहरात नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे उखडले गेल्याने नवीन रस्ते तयार करावे, शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.