आ. अनिल पाटलांचा ५ मार्चला धरण पाहणी दौरा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांचा येत्या ५ मार्च रोजी धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित करण्यात आला असून सर्व धरणप्रेमींना उपस्थितीचे आवाहन केले आहे.

तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यासह व परिसरातील शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनीच दरम्यानच्या काळात खंड पडलेल्या धरणाच्या कामात कुठेतरी गती येत असल्याने या कामास सर्वांच्या सदिच्छा मिळाव्यात म्हणून आ.अनिल पाटील यांचा धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी तमाम पाडळसरे धरण प्रेमी आणि राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवाना “चला जाऊया पाडळसरे धरणावर” असे भावनिक आवाहन केले आहे.

शनिवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता हा धरण पाहणी दौरा होणार आहे. या दौऱ्यात आमदार अनिल पाटील यांच्यासोबत पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच धरणाविषयी विशेष आस्था असणारे माजी आ.डॉ.बी एस पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांचीही उपस्थिती असण्याचे संकेत मिळाले आहेत. सदर पाहणी दौरा राजकीय नसून केवळ धरणाविषयी आस्था व तळमळ असणारा असल्याने सर्वपक्षीय मंडळीसाठी हा खुला असणार आहे. त्यामुळे यादिवशी धरणावर हितचिंतकांचा मोठा मेळाच भरणार आहे.

सदर दौरा आयोजित करण्याचे कारण म्हणजे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभेत प्रवेश केल्यापासूनच धरणाच्या कामास गती देण्याचा प्रयत्न केला आहे. यात धरणाचे डिझाईन असो किंवा इतर तांत्रिक दोष असो अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. एवढेच नव्हे तर मागील बजेट अधिवेशनात राज्य शासनाकडून तब्बल 135 कोटी निधीची तरतूद केल्याने अतिशय वेगाने धरणाचे काम सुरू झाले. परंतु धरणाचे डिझाईन बदलल्याने त्याचे आदीक्यही वाढले यामुळे चालू वर्षी पिअर्सचे काम सुरू न होता पूर्ण निधी खर्च होऊ शकला नाही. तरी देखील इतर कामे मात्र मोठ्या प्रमाणात झाली आणि येत्या बजेटमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे निधीसाठी वारंवार तगादा लावल्याने पदाधिकारी आणि धरण जनआंदोलन समिती सोबतच्या नुकत्याच झालेल्या भेटीत जलसंपदा मंत्र्यांनी मागील वर्षापेक्षा अधिक निधी देण्याचे जाहीर केल्याने कामाच्या प्रगतीच्या दृष्टीने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.

विशेष म्हणजे आमदारांच्या मागणी नुसार वाढीव आदिक्याच्या प्रस्तावास 15 दिवसात मंजुरी देण्याचे आदेश देखील जलसंपदा मंत्र्यांनी दिले असल्याने प्रत्यक्षात पिअर्सचे काम देखील सुरु होऊ शकणार आहे. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. धरणाची सत्य परिस्थिती सर्वाना अवगत व्हावी आणि सर्वांच्या सदिच्छा तुन धरणाच्या कामास गती मिळावी यासाठीच आमदारांनी हा सामूहिक धरण पाहणी दौरा आयोजित केला आहे.

तरी धरणाच्या हितासाठी सर्वांनीच एक दिवसातील केवळ थोडा वेळ काढुन दि.5 रोजी धरणस्थळी अवश्य पोहोचावे, असे विनम्र आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Protected Content