यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील परसाडे गावी गुरुवारी २० फेब्रुवारी खळवाडीला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीत एक बैल जळून खाक झाला, तर दुसरा ९० टक्के भाजला असून मृत्यूशी झुंज देत आहे. यासोबतच शेती अवजारे, बैलगाडी आणि गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या या दुर्घटनेत चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
परसाडे बुद्रुक गावात राहणारे प्रभाकर शंकर पाटील आणि आशाबाई शंकर पाटील यांच्या मालकीच्या खळवाडीत आग लागली. या आगीत त्यांचा एक बैल पूर्णपणे जळाला, तर दुसरा गंभीररित्या भाजला आहे. याव्यतिरिक्त त्यांची बैलगाडी, शेती उपयोगी अवजारे आणि चारा देखील आगीत जळून खाक झाले. यामुळे पाटील कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आग विझवण्यासाठी यावल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने बोलावण्यात आले. तसेच, गावचे सरपंच पती डॉ. राजू तळवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. त्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
तलाठी आणि सर्कल यांनी पंचनामा करून तो महसूल प्रशासनाकडे पाठवला आहे. आमदार अमोल जावळे यांनी घटनास्थळाला भेट दिली, त्यावेळी परसाडेचे सरपंच मीनाताई तडवी, अतुल भालेराव, रमेश साबळे, प्रल्हाद डालू चौधरी, रोशन दळवी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर पाटील हे बैलजोडी भाड्याने देऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यावर ओढवलेल्या या संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.