रेल्वेतून पडल्याने साकळीतील शेतकऱ्याचा केरळमध्ये दुर्दैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे स्थायिक असलेले आणि मूळ साकळी येथील रहिवासी प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) यांचा केरळमधील प्रवासात रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. २३ मार्चच्या मध्यरात्री कासारगड-निलेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकाश जैन हे व्यवसायाने शेतकरी असून जळगाव येथे औषध विक्री व्यवसायात मुलाला मदत करत होते. ते आपल्या कुटुंबासह केरळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. दि. २१ मार्च रोजी भुसावळहून मंगला सुपरफास्ट एक्स्प्रेसने त्यांनी प्रवास सुरू केला होता. प्रवासादरम्यान २३ मार्च रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास लघुशंकेसाठी गेलेल्या प्रकाश जैन यांनी पुढील स्थानक किती दूर आहे, हे पाहण्यासाठी दरवाजाजवळ गेल्यानंतर तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले.

गाडीत अन्य प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यांचा मुलगा स्वप्निल जैन यांनी तत्काळ चैन ओढून रेल्वे थांबवली आणि घटनास्थळी धावत गेले. त्यांना लोखंडी पाइप लागल्याने पोटाला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठा रक्तस्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. रेल्वे पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने कासारगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव जळगाव येथे आणण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश जैन यांना पूर्वी कॅन्सर झाला होता, मात्र त्यांनी त्यावर यशस्वी मात केली होती. तसेच, कोरोना काळात देखील त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. साकळी गावातील एक प्रगतीशील शेतकरी, धार्मिक वृत्तीचे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व गमावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content