अमळनेरमध्ये अहिराणी साहित्य संमेलनात रंगणार सांस्कृतिक सोहळा

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील साहित्य आणि संस्कृतीला उजाळा देणारे राज्यस्तरीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन ३० आणि ३१ मार्च रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. लोककवी, लेखक, नाट्यकलावंत, मिमिक्री कलाकार आणि एकपात्री नाटककार यांच्या बहारदार सादरीकरणामुळे हे संमेलन रसिकांसाठी समृद्ध करणारे ठरणार आहे. संमेलनाच्या भरगच्च कार्यक्रमपत्रिकेची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम
संमेलनात नामवंत सिनेगीतकार आणि पार्श्वगायक प्रशांत मोरे यांच्या आवाजात अहिराणी कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच अहिराणी भाषेच्या जतनासाठी अहिराणी शब्दकोश आणि ओवीकोष तसेच अहिराणी गीतांचा चिकित्सक अभ्यास करणारे डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे अभ्यासपूर्ण विवेचन होणार आहे. नाट्य अभिनेता हर्षल पाटील यांचे नाट्य अभिवाचन, सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट विलासकुमार शिरसाठ यांची अहिराणी मिमिक्री आणि प्रसिद्ध एकपात्री नाटककार प्रविण माळी यांचा एकपात्री प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

मान्यवरांचा गौरवशाली सहभाग
संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अनुप अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवरही या संमेलनात सहभागी होणार आहेत.

भव्य उद्घाटन सोहळा आणि पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण
३० मार्च रोजी संमेलनाची सुरुवात अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक रॅली आणि ग्रंथदिंडीने होणार आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, आयएएस अधिकारी राजेश पाटील आणि सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल. उद्घाटनानंतर काव्यसंमेलन रंगणार असून त्यात कवी ज्ञानेश्वर भामरे, डॉ. वाल्मिक अहिरे, दादाभाई पिंपळे आणि रमेश धनगर यांची रसिकांना काव्याची मेजवानी मिळणार आहे. रात्री ८ वाजल्यापासून जात्यावरच्या अहिराणी ओव्या, खानदेशी गाणी, अहिराणी नाटिका, कानबाई नृत्य आणि मिमिक्री यांचा समावेश असलेला खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी साहित्य आणि विचारमंथन
३१ मार्चला ‘अहिराणी माय आमना खंडेश आणि अभिमान अहिराणी ना’ या नवकवी संमेलनानंतर अहिराणी भाषा आणि संस्कृतीवर परिसंवाद होणार आहे. याचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रविंद्र ठाकूर भूषवतील. परिसंवादात डॉ. फुला बागुल, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. जगदीश मोरे, डॉ. बाळासाहेब गुंजाळ आणि डॉ. कृष्णा पोतदार हे आपले विचार मांडणार आहेत. यानंतर सुप्रसिद्ध कथाकार एस. के. पाटील, प्राचार्य संजीव गिरासे, गोकुळ बागुल आणि वृषाली खैरनार यांच्या कथाकथनाचा आनंद श्रोत्यांना मिळणार आहे.

विशेष कार्यक्रम आणि समारोप
दुपारच्या सत्रात यापूर्वी अमळनेर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले तसेच आपल्या अहिराणी गीतांमुळे प्रसिद्ध सुदाम महाजन यांचा अहिराणी झटका रसिकांना अनुभवायला मिळेल. त्यानंतर महाराष्ट्रभरातील नामवंत कवींची काव्यमैफिल रंगेल. या कार्यक्रमाला भाषा संचालनालयाचे अध्यक्ष सुनील शिरसाठ विशेष उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर “आयतं पोयतं सख्या नं” या लोकप्रिय एकपात्री प्रयोगाने प्रविण माळी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

संमेलनाचा समारोप माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शरद पाटील आणि माजी आमदार बी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संमेलनासाठी विशेष आवाहन
अहिराणी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, उपाध्यक्ष डी. ए. पाटील, साहित्यिक समन्वयक डॉ. कुणाल पवार आणि महिला समन्वयक वसुंधरा लांडगे यांनी रसिक प्रेक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content