अपघातात प्रौढाच्या मृत्यूप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने प्रवास करत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पटली होवून ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळ घडली होती. यात दोन महिला जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी चौकशी अंती रिक्षाचालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवसन खंडू कोळी वय ५० रा. पाळधी ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भिवसन कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू २८११) ने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना रिक्षा चालक समाधान सुभाष कोळी यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पटली झाली. यात भिवसन कोळी हे दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी मयत घोषीत केले होते. तसेच रिक्षातील शोभाबाई सुभाष कोळी आणि अनुबाई तुकाराम बिऱ्हाडे या दोन महिला देखील जखमी झाल्या. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता रिक्षा चालक समाधान कोळी याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Protected Content