जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २१ दिवसांची संचीत रजा संपल्यानंतरही तांबापूर येथे राहणारा न्यायालयीन बंदी हा छत्रपती संभाजी नगर येथील कारागृहात हजर न राहता फरार झाल्याने अखेर रविवारी १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुड्डू उर्फ कानाशा वहाब शेख वय-३५ रा. तांबापूर जळगाव असे फरार झालेला बंदीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एका गंभीर गुन्ह्यात बंदी गुड्डू उर्फ कानाशा वहाब शेख हा छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना कारागृह महानिरीक्षक यांनी २१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान २१ दिवसांची संचीत रजा मंजूर करण्यात आली होती. २१ दिवस उटून गेल्यानंतर न्यायालयीन बंदी गुड्डू उर्फ कानाशा वहाब शेख हा छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कारागृह शिपाई महेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रविवारी १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवी कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.