Home प्रशासन नगरपालिका पाचोरा शहरातील सुरू असलेले भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यात

पाचोरा शहरातील सुरू असलेले भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यात


पाचोरा प्रतिनिधी । शहरात सुरू असलेले भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यात येवुन ठेपले आहे. २००७ मध्ये शहरातील भुयारी गटारी सर्वेक्षण करण्यात आले होते.  २०१७ मध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये हे काम २५ टक्के बाकी असुन या १३ वर्षात २५ ते ३० टक्के शहर वाढले आहे. अंडर ग्राउंड गटारीसाठी वाढीव २ कोटी रुपये निधी अपेक्षित असुन याबाबतचे अंदाजपत्रक राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर,  जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक सतीश चेडे, वाल्मिक पाटील, आनंद पगारे, दादाभाऊ चौधरी, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील, दिपक पाटील (जारगांव), नितीन पाटील उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातुन वाहणारी हिवरा नदीवर असलेल्या कृष्णापुरी व विठ्ठल मंदिरा जवळील पुलांचे काम लवकरच सुरू होणार असून या पुलांच्या कामासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. येत्या एक ते दोन महिन्यात या पुलांचे काम पुर्ण होणार आहे. तसेच स्मशानभुमी ते शहरातील बाह्यमार्गाला जोडेल असा पुल बनविण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रस्तावित असुन या नविन पुलाच्या कामाला ही मंजुरी मिळाली आहे. या पुला करीता ६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झालेला असुन मंजुर निधीतील २ कोटी रुपये ही प्राप्त झालेला आहे.

गेल्या ४० वर्षांपूर्वी कै. के. एम. (बापु पाटील) यांनी तालुक्याला वैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने शहरात खत कारखाना आणला. सद्यस्थितीत विविध खाजगी कंपन्यांनी बाजार पेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. महामंडळाच्या खत कारखाने केवळ १८:१८:१० याचेच उत्पादन करत असुन यामुळे शासन हे राज्यात सुरु असलेले खत कारखाने बंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. १८:१८:१० सह अन्य उत्पादने निर्मिती व्हावी. यासाठी वारंवार पाठपुरावा करुन शेवटी शहरातील खत कारखान्यात बांधकामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये व आधुनिक मशनरीसाठी ३ कोटी ५० लाख रुपये असा ७ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. या खत कारखान्याच्या कामाचे भुमिपुजन व “शिवतीर्थ” या ओपन स्पेस मध्ये बनविण्यात आलेल्या भव्य उद्यानाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दि. १७ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळालेली असुन भडगाव तालुक्यातील कजगाव व कोळगाव ही गावे अजुन ही पिक विम्यापासुन वंचित आहेत. मंगळवारी मुंबई येथे बैठकीत हा विषय उपस्थित करुन या गावातील शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही आ. किशोर पाटील यांनी सांगितले.

शहरातील नुतन शॉपिंग कॉम्लेक्सची बोली लिलाव

शहरातील व्यापाऱ्यांसाठी व भाजीपाला विक्रेत्यांसाठी भव्य असे २५० गाळ्यांचे शाॅपिंग काॅम्प्लेक्सचे काम पुर्ण झाले आहे. राज्याच्या आदेशानुसार ई – टेंडरने सदरचे गाळे व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांना देण्यात यावे असे सुचित केल्यानंतर मी व नगरपालिकेने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवुन सदर गाळ्यांचे हस्थातंरण पारदर्शकपणे बोली लिलाव करुन करण्यास संमती मागितली होती. जिल्हाधिकारी यांनी यास अनुमती दिली असुन १५ ते २० दिवसानंतर या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.


Protected Content

Play sound