अधिक सावधानता बाळगायला हवी ; पंतप्रधान मोदी

 

नवी दिल्ली, वृतसेवा | कोरोनाविरुद्धची लढाई ही देशातील नागरिकांच्या संकल्पनेमुळे लढली जात आहे. नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबत देशवासीयांची सेवाशक्तीही या लढाईत महत्त्वाची ठरत असून कोरोना लसीवर देशांत काम सुरु आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संबोधित करताना सांगितले. सोमवार १ जूनपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा संपून अनलॉक-१ सुरू होऊन ३० जूनपर्यंत सुरु राहणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले कि, मी गेल्यावेळी जेव्हा आपल्याशी मन की बात कार्यक्रमातून तुमच्याशी संवाद साधला होता तेव्हा बऱ्याच गोष्टी बंद होत्या. पॅसेंजर आणि इतर रेल्वे ट्रेन बंद होत्या. परंतु,  आता भरपूर काही सुरु झालं आहे. देशात स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु आहेत. याशिवाय इतर स्पेशल ट्रेनही सुरु करण्यात आल्या आहेत.  विमान सेवा सुरु झाली आहे. हळूहळू उद्योगधंदेही सुरु होत आहेत. याचा अर्थ असा की, अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असलेल्या बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला अधिक सावधानता बाळगायला हवी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. तोंडावर मास्क लावा, हात धुणं आणि घरातचं राहणं या साऱ्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं जावं. देशात सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी कोरोनाविरोधातील लढाई लढली जात आहे. आपली लोकसंख्या जगभरातील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असून आव्हानंदेखील भिन्न स्वरुपाचे आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना तितक्या वेगाने पसरु शकला नाही. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील आपल्या देशात कमी आहे. जे नुकसान झालं आहे, त्याचं दु:ख आपल्या सगळ्यांना आहे.  नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबतच आणखी एक शक्ती ताकदवान शक्ती या लढाईत महत्त्वाची ठरत आहे. ती शक्ती म्हणजे देशवासियांची सेवा शक्ती आहे. महामारीच्या संकंटात आपण दाखवून दिलं की, सेवा आणि त्याग आमचा विचार फक्त आमचा आदर्शच नाही तर भारताची जीवनपद्धत आहे. “‘सेवा परमो धर्म’, असं आपल्याकडे म्हटलं जातं.  आपले डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाईकामगार, मीडिया कर्मचारी हे सर्व सेवा करत आहे. सेवामध्ये आपलं सगळं समर्पित करणाऱ्या लोकांची संख्या अगणित आहे. तमिळनाडूतील सी. मोहन नावाच्या सलून चालवणाऱ्या एका सज्जन गृहस्थ आहे. त्यांनी मेहनतीच्या कमाईने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ५ लाख रुपये वाचवून ठेवले होते. त्यांनी ती सर्व रक्कम गरीब आणि होतकरु नागरिकांसाठी खर्च केली.

या संकंट काळात देशातील नागरिकांच्या प्रयत्नांमधील नाविन्यता माझ्या मनाला दिलासा देऊन गेली. देशभरातील छोट्या गावांपासून शहरांपर्यंत, छोट्या ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेकजण कोरोनाविरोधाच्या लढाईत नव्या पद्धतीने लढत आहेत. नवे संशोधन करत आहेत. नाशिकचे राजेंद्र यादव यांचं उदाहरण आवर्जून घ्यावसं वाटतं. राजेंद्र हे नाशिकच्या एका गावाचे शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी एक सॅनिटायझर मशीन बसवलं आहे. हे मशीन खूप प्रभावितपणे काम करत आहे. अशाचप्रकारे मी अनेक उदाहरण सोशल मीडियावर बघत आहे. दुकानदार देखील तसंच प्रकारे काम करत आहेत.

आपले राज्य, जिल्हे, गाव आत्मनिर्भर असते, तर संकट इतकं गडद नसतं. मात्र आता अनेक ठिकाणी जागृती, मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळत आहे, बरेच जण ‘लोकलसाठी व्होकल’ झाले,” असेही मोदींनी यावेळी सांगितले.  इलेक्ट्रॉनिक वस्तू, युरिया अशा अनेक वस्तू आयात न करता देशात तयार केल्यास प्रामाणिक करदात्यांनी भरलेला पैसा आयातीवर खर्च होणार नाही. हॉलीवूड ते हरिद्वार, सगळेच आयुर्वेद आणि योग अवलंबत आहेत, कोरोना श्वसनसंस्थेला जखडतो, त्यामुळे या काळात योगचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.  मोदी यांनी पुढे सांगितले की, आयुष्मान भारतचा लाभ १ कोटीहून अधिक कुटुंबांना मिळाला, १ कोटी गरीब म्हणजे नॉर्वे, सिंगापूर देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांचे १४ हजार कोटी वाचले, १ कोटींपैकी ८० टक्के लाभार्थी ग्रामीण भागातले आहे. यात ५० टक्के लाभार्थी या माता-भगिनी आहेत.

ओडीसा-पश्चिम बंगालमध्ये नैसर्गिक संकट, तर कृषी क्षेत्रावर टोळधाडीची आपत्ती, आपण या संकटांवरही मात करु, असेही मोदी यावेळी म्हणाले. पाण्याची बचत करण्याला पावसाळ्यात प्राधान्य द्या, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन कर्तव्य पार पाडा, उष्मा वाढत असल्याने पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला विसरु नका, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला केलं.

Protected Content