वाधवान प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ; फडणवीस यांची मागणी

 

नागपूर (वृत्तसंस्था) वाधवान बंधूंना मुभा देण्यामागे सरकारमधील बड्या नेत्यांचाच हात असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली आहे.

 

लॉकडाऊनच्या काळात दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना प्रवासाची मुभा देणारे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट देण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधूंना सहकुटुंब खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासाची मुभा देण्यात आली होती. परंतू गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आता गुप्ता यांची पुन्हा त्याच जागेवर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एखादा अधिकारी अशा प्रकारे स्वत:च्या अधिकारात इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. कोणाच्या तरी इशाऱ्यावरून किंवा आदेशानंच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे आमचे म्हणणे आता खरे ठरल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हायला हवी, अशी मागणी देखील श्री. फडणवीस यांनी केली.

Protected Content