एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील एकुण ६४ गावात लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात पाळला जात असुन शहरात मात्र काही तरूणांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. त्याच्या परिणामी त्यांना त्याचा दंड पण मिळत आहे. परंतू तरुण सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असतांना देखील त्याला देशावर आलेल्या संकटाचे गांभीर्य का लक्षात येत नाही ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.
आज लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील गावांमध्ये पूर्णपणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी समजावुन सांगितल्याप्रमाणे कोणीही घराच्या बाहेर निघालं नाही. फक्त शेतात व दवाखान्यात काही महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर निघतांना तेही एक, दोनच्या संख्येने दिसत होते. याच बरोबर शहरातील काही किराणा दुकानांवर व दवाखान्यात काही प्रमाणात गर्दी दिसुन आली. तर दिवसभर स्थानिक पोलीस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी यांच्या पथकाने गर्दी कमी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी मात्र सर्वाधिक प्रमाणात युवक लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना दिसले.
नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
नगर पालिका कर्मचारी फक्त गर्दी कमी करतांना दिसत असुन शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.याच बरोबर ज्या पद्धतीने शहरातील प्लॅस्टिक मुक्तीसाठी एरंडोल नगर पालिका कर्मचारी काम करीत असतात त्याच पद्धतीने त्यांनी स्वच्छतेकडे देखील आजच्या घडीला महत्व देऊन गावात,नविन वसाहतींमध्ये स्वच्छता व फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.