शालकांच्या मारहाणीत मेव्हण्याचा मृत्यू; लोहारा येथील घटना

Lohara news

जळगाव प्रतिनिधी । बहिणीला मारल्याचा रागातून शालकांच्या बेदम मारहाणीत मेव्हण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, रविंद्र बालचंद्र चौधरी (वय-32) रा. लोहारा ता.पाचोरा हा पत्नी सरला आणि कोमल व रेणूका या दोन मुलींसोबत राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान त्यांना दारूचे व्यसन जडले होते. गेल्या दोन ते तीव वर्षांपासून दारू पिऊन घरात पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. याला कंटाळून पत्नी सरला दोन्ही मुलींना घेवून तरवाडे ता.बोदवड येथे माहेरी निघून गेल्या. त्यानंतर पत्नीला घेण्यासाठी रविंद्र चौधरी मंगळवारी सासरी गेला होता. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पत्नीसह घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी सरलाला शिवीगाळ करून मारहाण केली व आज तुला जिवंत सोडणार नाही. असे सांगून पुन्हा दारू पिण्यासाठी निघून गेला. यानंतर सरला चौधरीने आपले भाऊ गोपाल नारायण चौधरी आणि कृष्णा नारायण चौधरी दोन्ही रा. तरवाडे ता.बोदवड यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही भाऊ घरी येवून रात्री 10 वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत असलेले रविंद्र चौधरी यांचे दोन्ही हात व पाय बांधून लाकडाच्या दांडूक्या अडकवून बेदम मारहाण केली व गावाकडे निघून गेले. यातच त्याचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
मयत रविद्र चौधरीच्या घरापासून काही अंतरावर मोठा भाऊ जितेंद्र बालचंद्र चौधरी आणि दिलीप बालचंद्र चौधरी राहतात. त्यांना देखील मारहाण केल्याची माहिती मिळाली नाही. मात्र सरलाने दोन्ही भावांना फोन करून बोलावून घेतले व रात्री मारहाण केल्यामुळे भावाचा मृत्यू झाला असा आरोपी मयताचा भाऊ जितेंद्र चौधरी व आई यांनी केला. तिघांनी मिळून रविंद्रचे हात पाय बांधून मारहाण केली व गळ्याला गळफास देवून खून केला आहे, असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयतची आई व दोन्ही भाऊ यांनी केली आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आला असून पिंपळगाव पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि श्री. बागुल करीत आहे.

Protected Content