मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीआधी आणि निकालानंतर राज्यात अनेक मोठे राजकीय भूकंप झाले होते. राज्यात पुन्हा एकदा लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात दोन महिने भूकंपाचे आहेत. सुरावातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भूकंप झाला. आता कोणाचा भूकंप होणार? हे आपण पाहू, मात्र एखादा भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संसदेत नुकतेत मंजूर झालेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून देशभरात आणि विशेषत: ईशान्य भारतात आंदोलनाची लाट उसळली आहे. केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल या बिगर-भाजप राज्यांनी हा कायदा राज्यात लागू करणार नसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रासह इतर कोणत्याही राज्याने हा कायदा लागू न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास केंद्र सरकार कठोर पाऊल उचलू शकते. केंद्र सरकार थेट राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्याय अंमलात आणू शकते. तसे झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते.