भुसावळ, प्रतिनिधी | येथील दिनदयाल नगर भागातून शनिवार ९ नोव्हेंबर रोजी जेवणासाठी जात असलेल्या दोघा मित्रांना तिघांनी मारहाण करून त्यांच्या जवळील दोन मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांत दोघांना अटक केली आहे.
फिर्यादीनुसार वृत्त पुढील प्रमाणे, गणेश अशोक दांडगे (वय- २६, रा. सिलोड जि. औरंगाबाद) व त्याचा मित्र अंकुश रानगोते असे शनिवार ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जेवण करण्यासाठी भुसावळ शहरातील दीनदयाल नगर भागातून जात होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी गणेश दांडगे व त्याच्या मित्र अंकुश रानगोते यांच्याजवळील १२ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल मारहाण करून जबरी हिसकावून घेतले होते.या घटनेतील आरोपींची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळलेल्या गुप्त बातमी वरून दोघा संशयितांना नाहाटा चौफुली भागातून अटक करण्यात आली. यात इमरान शेख महमूद शेख (वय-१८ रा.मनमाड जि. नाशिक) व राजकुमार कडू दावडे (वय- २३, रा.नेपानगर जि. बऱ्हाणपूर) यांचा समावेश आहे. बाजारपेठ पोलिसांनी नाहाटा चौफुली भागातून गुन्हा घडल्याच्या काही तासांत संशयितांना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके ,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.काॅ. सुनील जोशी, पो.ना. चंद्रकांत बोदडे,रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर पो.काॅ. विकास सातदिवे, समाधान पाटील, ईश्वर भालेराव आदींनी केली आहे. या गुन्हाचा पुढील तपास पो. उप निरी. सरिता कोळपकर व पो.काॅ. रविंद्र तायडे करीत आहेत.