Home उद्योग मातीतून उगवला ‘युवा शेतकरी हिरा’ ; ५० एकर शेतीतून दोन कोटींहून अधिक...

मातीतून उगवला ‘युवा शेतकरी हिरा’ ; ५० एकर शेतीतून दोन कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्नाचा विक्रम

0
28

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता आपल्या मातीतच भविष्य घडवण्याचा निर्णय घेत आधुनिक शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या अक्षय कैलास पाटील यांनी ग्रामीण युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. एम.एससी., बी.एड. शिक्षण घेतलेल्या अक्षय पाटील यांनी सुमारे ५० एकर शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास यांची सांगड घालत वार्षिक दोन कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत असल्याचे सांगितले जाते. मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावातील त्यांची ही यशोगाथा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश युवक नोकरीच्या शोधात शहरांकडे वळतात. मात्र अक्षय पाटील यांनी या पारंपरिक वाटेऐवजी शेतीला आपले करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. ‘काळ्या आईची सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड दिली. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता नियोजनबद्ध उद्योग म्हणून पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे त्यांच्या शेतीला वेगळी ओळख मिळाली आहे.

अक्षय पाटील यांच्या कुटुंबाकडे जवळपास ५० एकर शेती आहे. या शेतीमध्ये केळी, हळद, तूर, हरभरा, मका, ज्वारी, कपाशी, आले, मोहरी आणि पपई यांसारख्या विविध पिकांचे नियोजनबद्ध उत्पादन घेतले जाते. पीक फेरपालट, आधुनिक सिंचन व्यवस्था, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, योग्य पिकांची निवड, वेळेवर मशागत, रोगराईचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास या बाबींवर त्यांचा विशेष भर असतो.

शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची वृत्ती असून उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार व अधिक उत्पादन मिळवण्यावर ते भर देतात. हवामानातील बदल, बाजारभावातील चढ-उतार आणि नैसर्गिक संकटे यांचा विचार करून पीक नियोजन केले जाते. त्यामुळे त्यांच्या शेतीकडे परिसरातील अनेक शेतकरी उत्सुकतेने पाहत असून, आधुनिक शेती पद्धतींची माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जातो.

शेमळदे गावातील त्यांच्या शेतात उत्पादित होणाऱ्या केळीला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातही मागणी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या शेतातील केळी इराण आणि दुबईसारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात होत असल्याचे ते सांगतात. याशिवाय मुंबई, दिल्ली, श्रीनगर, जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांसह देशातील विविध भागांतही त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. एका छोट्याशा गावातील शेतातून तयार झालेला कृषीमाल देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचणे ही शेमळदे परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

केळी आणि पपईसारख्या पिकांना अवकाळी पाऊस, वादळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई तसेच बाजारभावातील अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणींमुळे खचून न जाता आधुनिक तंत्रज्ञान, वेळेचे अचूक नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर अक्षय पाटील शेतीतील आव्हानांना सामोरे जात आहेत. उत्पादनासोबतच गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

हळदीच्या उत्पादनातही अक्षय पाटील यांनी उल्लेखनीय प्रयोग केले असून त्यांच्या हळदीच्या उत्पादनाची परिसरात विशेष चर्चा आहे. त्यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी हळद लागवडीकडे वळत असल्याचे सांगितले जाते. आपल्या शेतीतील अनुभव आणि ज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या भावनेतून ते शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठीही पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांच्या शेतीला केवळ उत्पादनाचे केंद्र न राहता इतर शेतकऱ्यांसाठी प्रयोग आणि मार्गदर्शनाचे ठिकाण म्हणूनही महत्त्व प्राप्त झाले आहे.

अक्षय पाटील यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाची भक्कम साथ आहे. त्यांचे वडील कैलास पांडुरंग पाटील यांनी मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत शेतीची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. आईचे संस्कार, लहान भावाची साथ आणि पत्नीचे मोलाचे सहकार्य यामुळे शेतीचा हा प्रवास अधिक बळकट झाला. विशेष म्हणजे अक्षय पाटील यांच्या पत्नीही एम.एससी., बी.एड. शिक्षित असून त्यांनी नोकरीचा मार्ग न स्वीकारता शेतीमध्ये पतीच्या खांद्याला खांदा लावून योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटील कुटुंबाच्या जीवनात शेतीसोबत संस्कार आणि अध्यात्मालाही महत्त्वाचे स्थान आहे. अक्षय पाटील यांचे वडील कैलास पांडुरंग पाटील हे आदर्श शेतकरी, धार्मिक वृत्तीचे आणि वारकरी परंपरेशी निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित आहेत. शेतीचा मोठा व्याप सांभाळतानाही ते दरवर्षी संत मुक्ताई पालखी सोहळ्यात पायी वारी करतात. गावातील श्रीमद्भागवत कथा, भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळवण्यासाठी न करता त्यातून मिळालेले ज्ञान शेतीत वापरल्यास ग्रामीण भागातही मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, हे अक्षय पाटील यांच्या कार्यातून दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य पीक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर शेतीही कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय बनू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

अक्षय पाटील यांची यशोगाथा ही केवळ एका शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगतीची कहाणी नाही, तर ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. गाव सोडून शहरातच संधी शोधण्याऐवजी आपल्या मातीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करता येतात, असा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. मातीशी नाळ कायम ठेवत शिक्षणाला आधुनिक शेतीची जोड, कुटुंबाची साथ आणि कष्टांची ताकद मिळाली तर यशाची उंची गाठता येते, हे शेमळदेचे अक्षय कैलास पाटील यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. ५० एकर शेतीतून दोन कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न मिळवण्याच्या त्यांच्या प्रवासामुळे ते मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण युवकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहेत.


Protected Content

Play sound