यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी भालोद येथील प्रगतिशील शेतकरी, यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण (बापू) शशिकांत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील योगदान आणि शेतकरी प्रश्नांवरील कामाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नारायण चौधरी हे भालोद येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित असून, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाच्या कृषीभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या जळगाव पूर्व किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नारायण बापू चौधरी यांची निवड झाल्यानंतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री ना. रक्षा खडसे, महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, डॉ. नरेंद्र कोल्हे, नगरसेवक उमेश फेगडे, राकेश कोलते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायण चौधरी यांच्या निवडीचे स्वागत केले.

किसान मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व कृषीविषयक उपक्रमांची माहिती पोहोचविणे तसेच ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता नारायण चौधरी यांच्यावर राहणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा किसान मोर्चाच्या कार्याला होईल, अशी अपेक्षा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नारायण चौधरी यांच्या निवडीमुळे जळगाव पूर्व जिल्ह्यात भाजप किसान मोर्चाला संघटनात्मक बळ मिळण्यासोबतच शेतकरी वर्गाशी संपर्क अधिक वाढविण्यास मदत होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताचे प्रश्न आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विषय अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



