
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव विधान परिषद निवडणुकीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शेरोशायरीच्या शैलीत मनातील भावना व्यक्त करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधानपरिषदेसाठी तिकीट मिळाले नाही. मात्र मी एवढेच सांगतो, ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा’.” या शायरीतून त्यांनी विधान परिषद उमेदवारीबाबतची खंत अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रारब्धावर विश्वास ठेवण्याचा सल्लाही दिला. “देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगले होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. राजकारण जरूर करा, पण भगवा विचार कधी सोडू नका. तुम्ही मला आमदार केले, मंत्री केले म्हणूनच मी सामाजिक कार्य करू शकतो आणि तुमची सेवा करू शकतो,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, आपल्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली होती. मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्या पदरी निराशा पडल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचे पडसाद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही दिसून आले. भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरताना गुलाबराव पाटील उपस्थित राहिले नाहीत. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात उपस्थित असूनही शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनीही या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आल्याचे मानले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, शिंदे गटातील ही नाराजी आगामी निवडणुकांमध्ये महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही परिस्थिती विरोधकांसाठी संधी ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, विधान परिषद उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी आणि त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शायरीतून व्यक्त केलेल्या भावना सध्या जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरल्या आहेत.



