Home Cities जळगाव पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या वीज कपातीविरोधात काँग्रेस आक्रमक ; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या वीज कपातीविरोधात काँग्रेस आक्रमक ; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मिळणाऱ्या वीजपुरवठ्यात कपात करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा आणि शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी जोरदार मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अडचणीत या दरवाढीमुळे आणखी भर पडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित राहत नसून वाहतूक, किराणा, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे अर्थकारण विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महावितरणकडून कृषी पंपासाठी आठ तासांऐवजी सहा तास वीजपुरवठा करण्याचा आदेश लागू झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केळीसह विविध पिकांना पाण्याची नितांत गरज असताना वीज कपातीचा फटका थेट शेतीला बसत आहे. अनेक भागांत नियोजित वेळेपेक्षाही कमी वीज मिळत असल्याची तक्रार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिझेल टंचाईचाही फटका शेती क्षेत्राला बसत असल्याचे काँग्रेसने निवेदनातून स्पष्ट केले. शेताची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आवश्यक असताना डिझेलच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास उन्हात पेट्रोल पंपांवर थांबावे लागत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. यासोबतच रासायनिक खतांचे वाढते दर, निसर्गाची अवकृपा आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण काँग्रेस पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, ग्रामीण काँग्रेस पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी आणि जळगाव शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी सरकारने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. पेट्रोल-डिझेलचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवणे, दरवाढ मागे घेणे, रासायनिक खतांच्या किमती नियंत्रणात आणणे आणि कृषी पंपासाठी पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.


Protected Content

Play sound