वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज नगरपरिषदेत महत्त्वाची बैठक पार पडली. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मोहन आव्हाड, उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे यांच्यासह नगरपरिषद पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरणगाव शहरासाठी २०१९ मध्ये मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच, पूर्णत्वास आलेल्या या योजनेचे लोकार्पण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, सध्या वरणगाव शहरात पाच दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे, जे इतर काही शहरांच्या तुलनेत चांगली परिस्थिती आहे. मात्र, यावर समाधान न मानता वरणगावकरांना २४ तास अखंड पाणीपुरवठा देण्याचा उद्देश असून त्यासाठी वाढीव योजनेचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
बैठकीत पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार, सभापती निलेश खाचणे, नगरसेवक निलेश (नाना) चौधरी, माला मेढे, श्रद्धा गायकवाड, मनिषा माळी, माधुरी हळदे, रुशाली चौधरी, सय्यद इरफान, अशफाक शाह, वंदना पाटील, तृप्ता महाजन, भाग्यश्री सोनवणे, शबनम मिर्झा, इरफान खाटिक, शुभम जावळे, राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.



