धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि गोमाता संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी बांभोरी बु. येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या संवेदनशील विषयावर नागरिकांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहिम राबवून आपली भूमिका स्पष्ट केली.
भारतीय संस्कृतीत गाईला मातेसमान स्थान असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून तिचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, अलीकडील काळात तालुक्यात काही ठिकाणी गोवंश हत्येच्या घटना गुप्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक शांतता आणि धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, गोवंशाची अवैध आणि अमानुष वाहतूक ही गंभीर समस्या बनली असून कत्तलखान्यांकडे नेण्यात येणाऱ्या जनावरांच्या हालअपेष्टा रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर पोलिस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावर सोडून दिलेल्या किंवा निराधार अवस्थेत फिरणाऱ्या जनावरांच्या संरक्षणासाठी तालुक्यात शासकीय गोशाळा उभारण्याची आवश्यकता देखील नागरिकांनी मांडली आहे. अशा गोशाळांना चारा व पाण्याची व्यवस्था करून शासनाने आर्थिक व प्रशासकीय पाठबळ द्यावे, जेणेकरून गोवंशाचे संगोपन योग्य प्रकारे होऊ शकेल, असे निवेदनात नमूद आहे.
याशिवाय, तालुक्यात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांचा शोध घेऊन ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आज 27 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या या निवेदनाला गावातील अनेक नागरिकांचा पाठिंबा लाभला. गोहत्या थांबवण्यासाठी गावपातळीवर स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली होती. या वेळी नाना शिवलाल पाटील, धनराज हरी पाटील (आर्मी मॅन), किशोर निंबा पाटील, जगदीश श्रीराम जगताप, अमृत उत्तम पाटील, घनश्याम देविदास पाटील, दिपक खुशाल पाटील, संजय पाटील, अक्षय सोनवणे, जयेश पाटील, राज पाटील आदी उपस्थित होते.



