जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनाने आज अतिक्रमण निर्मूलनाची मोठी मोहीम हाती घेतली. कालिंका माता मंदिर ते काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून असलेले अतिक्रमण प्रशासनाने पूर्णपणे हटवले आहे. या धडक कारवाईत रस्त्यावर अडथळा ठरणारी पाच वाहने जप्त करण्यात आली असून, दुकानदारांनी अनधिकृतपणे उभारलेले सुमारे २० शेड्स काढण्यात आले आहेत.
कालिंका माता मंदिर ते कोल्हे विद्यालय हा मार्ग विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्यावर दुकानदारांनी आपले साहित्य पसरवून आणि लोखंडी व पत्र्याचे शेड्स उभारून रस्ता अरुंद केला होता. यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या अतिक्रण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आज सकाळी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.

मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर पार्क केलेल्या पाच गाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच, दुकानाबाहेर रस्त्याच्या जागेत घुसखोरी करणारे १५ ते २० शेड्स हटवण्यात आले. कारवाईच्या सुरुवातीला काही दुकानदारांनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने नियमांचा हवाला देत कोणाचीही गय न करता रस्ता मोकळा केला. या कारवाईनंतर परिसरात आता मोकळा श्वास घेता येत असून वाहतूक सुरळीत झाली आहे.



