नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशातील बँक कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारच्या नवीन ‘लेबर कोड’विरोधात उद्या, गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप केवळ बँकांपुरता मर्यादित नसून १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा एक भाग आहे. संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांना सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ (AIBEA), ‘बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ (BEFI) आणि इतर प्रमुख संघटना या संपात सहभागी होत असल्यामुळे बँक ऑफ बडोदा यांनी बीएसईला माहिती दिली आहे की, शाखांमध्ये कामकाजावर परिणाम होऊ शकतो. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना आगाऊ सावध केले असून, काही सेवांमध्ये मर्यादित प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो. आयडीबीआय बँकेलाही कर्मचारी संघटनांकडून संपाची नोटीस प्राप्त झाली आहे.

संपाचे मुख्य कारण म्हणजे सरकारने लागू केलेले नवीन चार लेबर कोड, जे २९ जुन्या कामगार कायद्यांची जागा घेणार आहेत. संघटनांनी यावर जोरदार विरोध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, संघटनांच्या नोंदणीसाठी कडक अटी लादण्यात आल्या आहेत आणि या बदलामुळे कामगारांच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर, बँक कर्मचाऱ्यांनी दीर्घ काळापासून ‘५ दिवसांचा कामाचा आठवडा’ लागू करण्याची मागणी करत आहेत, जी अद्याप पूर्ण झालेली नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किंवा कोणत्याही बँकेने १२ फेब्रुवारीला अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे बँका तांत्रिकदृष्ट्या उघड राहतील, पण कर्मचारी संपावर असल्याने काउंटरवरील व्यवहार, धनादेश वटवणे, कर्ज प्रक्रिया आणि इतर सेवा प्रभावित होतील. खाजगी बँकांमध्ये संपाचा परिणाम तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञ म्हणत आहेत.



