Home राजकीय सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ


मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेतील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय सुरू केला आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले आणि उपस्थित आमदारांनी एकमताने तो मंजूर केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निर्णयानंतर धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, संजय बनसोडे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेत गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून ते पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आले.

शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी यांच्यासह मोजकेच मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सोहळा अवघ्या दहा मिनिटांत पार पडला आणि शोकाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही औपचारिकता किंवा मोठा समारंभ टाळण्यात आला.

सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्री बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. सकाळपासूनच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला होता. गटनेतेपदाची निवड, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट आणि लगेचच शपथविधी अशा झपाट्याने घडलेल्या घटनांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाल्याचे स्पष्ट झाले. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, ही ऐतिहासिक बाब मानली जात आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरचा दहावा विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या या काळात कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी घेतील, मात्र कोणतेही सत्कार, हार-तुरा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात संवेदनशीलता आणि साधेपणा जपण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

राज्यातील सत्तेच्या पातळीवर मोठ्या शोकांतिकेनंतर झालेला हा बदल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्य आणि नेतृत्व टिकवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या वारशाला पुढे नेताना त्यांना प्रशासन आणि राजकारणात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Protected Content

Play sound