पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुणे जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिराचा विकास, भाविकांची सुरक्षितता आणि भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेता मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह विविध पायाभूत सुविधा कामांसाठी मंदिर तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ९ जानेवारी २०२६ पासून होणार असून, या काळात मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार तसेच भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीत मंदिरातील सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी तात्पुरती बंदी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ९ जानेवारीपासून पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद राहील.

दरम्यान, भाविकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर बंद राहणार नाही. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार असून, या दिवसांत दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर पुन्हा नियोजित कालावधीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल.
सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही तयारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कुंभमेळ्यापूर्वी लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता असून, त्यासाठी सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, विस्तारित सभामंडप आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध नसणार असून, कोणत्याही भाविकाला मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बांधकामाशी संबंधित यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतर कोणालाही परिसरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. भाविकांनी या निर्णयामागील कारणे समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन दृष्टीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तात्पुरत्या गैरसोयीच्या बदल्यात भविष्यात अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



