मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आज १७ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे मुक्ताईनगर शहरात अचानकपणे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला, ज्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान झाले आहे. पहाटे तीन ते चारच्या सुमारास झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची छपरे कोसळली, घरातील सामानाचे नुकसान झाले आणि संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
या आपत्तीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना तत्काळ मदतीची आवश्यकता असल्याने शिवसेनेने प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत वितरित करण्याची मागणी केली आहे. शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नागरिकांना सध्या घरगुती उपयोगाच्या वस्तूंपासून ते निवाऱ्यापर्यंत सर्वच पातळीवर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून त्वरीत कार्यवाही करणे गरजेचे आहे.”

या वेळी शिवसेना जिल्हा समन्वयक आरिफ आझाद, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अफसर खान, शहर संघटक वसंत भलभले, सोशल मीडिया तालुकाप्रमुख पप्पू मराठी, तसेच संतोष माळी, राजेंद्र तळले, दीपक कोळी आणि नगरसेवक पियुष महाजन यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी मिळून तहसीलदार यांना निवेदन देत प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया त्वरीत सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली.
शिवसेनेच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने पंचनामे करण्याची तयारी सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम सुरू आहे. नगरसेवक पियुष महाजन यांनीदेखील स्थानिक पातळीवर प्रशासनाशी थेट संवाद साधून तातडीच्या मदतीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.



