सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील बेटावद येथे घडलेल्या घटनेनंतर कौमी एकता फाउंडेशनने मयत सुलेमान पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान यांनी यावेळी कुटुंबाला आश्वासन दिले की, कौमी एकता फाउंडेशन सदैव पीडितांच्या पाठीशी उभे राहील आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत त्यांच्या मागणीसोबत खंबीरपणे राहील.
आजच्या या भेटीदरम्यान फाउंडेशनचे उपाध्यक्ष इरफान शेट्टी, सय्यद असगर दादा जावेद, जनाब मारुल जावेद भाई, मुल्लाजी जामनेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मुस्लिम जुमदार उपस्थित होते. घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला की, शहीद सुलेमान पठाण यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत हा पाठिंबा कायम ठेवण्यात येईल.

या संवेदनशील परिस्थितीत, पीडित कुटुंबाला भावनिक आधार देण्यासोबतच, त्यांना कायदेशीर लढाईत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कौमी एकता फाउंडेशनने दिले आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



