
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालक-मालक बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) जाहीर प्रवेश करत राजकीय आणि सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय सुरू केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत आणि पक्षाचे राज्यस्तरीय नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ रिक्षाचालक-मालक बांधवांनी अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. शहरातील वाढत्या वाहतूक समस्या, प्रशासनातील दुर्लक्ष, आणि रिक्षाचालकांच्या समस्या या पार्श्वभूमीवर मनसेच्या माध्यमातून एकजूट होऊन आवाज उठवण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
ॲड. जमील देशपांडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिक्षाचालक-मालकांच्या मागण्यांवर ठामपणे उभी राहील. रेल्वे स्टेशन परिसरात स्वतंत्र रिक्षा थांब्यासाठी वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.”
या प्रवेश सोहळ्यात महेंद्र सपकाळे यांच्या विशेष प्रयत्नातून विनोद रामा रायपुरे, कुणाल श्रीराम महाजन, देवचंद शेशमल जाधव, सतीश किसन गवळी, राजू सुरेश कोळी, शांताराम शालीग्राम वाघ, रामचंद्र बाजीराव चव्हाण, किरण बारकु पाटील, नीलेश चंद्रकांत चौधरी, राजेश उल्हास शेळके, जीवन प्रभाकर बारी, राहुल आनंदा पाटील यांच्यासह अनेकांनी मनसेची सदस्यता घेतली.
या कार्यक्रमाला मनसेचे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, महिला शाखा अध्यक्षा अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, दीपक राठोड, ॲड. सागर शिंपी, खुशाल ठाकूर, संजय मोती, ऐश्वर्य श्रीरामे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे रिक्षा व्यावसायिकांच्या मागण्या आणि समस्या यावर प्रभावीपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आगामी काळात मनसेच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांसाठी विशेष मोहिमा आणि उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



