
चाळीसगाव, प्रतिनिधी | जलसंकट ही समस्या मानवनिर्मित असून यावर उपाय देखील मानवालाच करावा लागणार आहे तरच आपल्या डोळ्यांना भविष्यात ही वसुंधरा हिरवीगार दिसणार असल्याचे प्रतिपादन डॉ उज्वलकुमार चव्हाण यांनी केले. ते हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव येथे जलपुनर्भरण (रेन वाटर हार्वेस्टिंग ) आणि वृक्षारोपण व सिडबॉल निर्मितीबाबत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

याप्रसंगी आयकर उपायुक्त मुंबई ,प.स.सदस्य जीभाऊ पाटील,मुख्याध्यापक साठे सर , सरपंच शेखर निंबाळकर , बाळासाहेब चव्हाण , उपसरपंच शेरबानो अलीम,ग्रा प सदस्य प्रमोद चव्हाण हे उपस्थित होते .श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जलव्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. आधुनिक काळात विभक्त कुटुंब पद्धती आल्याने शहरांमध्ये वाढ होतांना वृक्षांची कत्तल करून सिमेंटची जगले उभी करण्यात आली. यातून निसर्ग सौंदर्यावर , पर्यावरणावर आणि हवामानावर परिणाम झालेला दिसतो. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. हा प्रश्न सर्वानी एकत्र येऊन सोडविणे गरजेचे आहे. यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या धोरणानुसार सर्वानी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी जेणेकरून ते पाणी जमिनीत जिरवायला मदत होईल असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. सर्वानी वृक्ष लागवड करावी. मुलांनी वेगवेगळ्या झाडांच्या बियांना मातीच्या गोळ्यात रोवून सिडबॉल तयार करून ते शेताच्या बांधावर आणि रस्त्याच्या कडेला दुतर्फा जमिनीत बुजावे. अशा परिस्थितीत वृक्षलागवड करून आणि त्यांचे संवर्धन करणे ही भविष्यासाठी गरजेची बाब आहे हे लक्षात घ्यावे असे स्पष्ट केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. व्ही. साठे यांनी तर आभार व्ही. टी. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक दीपक रणदिवे आणि इतर शिक्षकांनी कामकाज पहिले.



