मविआ जागावाटपाचा वाद मिटवण्याची काँग्रेसने दिली ‘या’ नेत्यांला जबाबदारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी मध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना जागा वाटपाच्या कारणावरून खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लक्ष केले. पटोले यांनीही त्यांना उत्तर दिल्याने मोठे शाब्दिक युद्ध रंगले. त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले. नंतर या उभयतांनी माध्यमांसमोर येत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे पान उलटत नाही तोच खासदार संजय राऊत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही गुप्त भेट झाल्याची बातमी पसरली. एवढेच नाही तर स्वबळावर लढण्याची भाषाही बोलली गेली. या प्रमुख घटनांसह अन्य छोटे मोठे खटके या दोन महत्त्वाच्या पक्षात उडाल्याने महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पुढे केले आहे.

थोरात हे शांत, संयमी व तोलून मापून बोलणारे अनुभवी नेते समजले जातात. माध्यम स्नेही नसल्याने ते काहीसे मागे पडतात अशी कबुली काँग्रेस मधीलच त्यांचे समर्थक देत असतात. २०१९ मधील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आकाराला आणण्याचे महत्त्वाचे काम खासदार राऊत, आमदार थोरात यांनी शरद पवार यांच्या साथीने केले होते. राज्यातील काँग्रेस नेत्यांना काल दिल्लीत पाचरण करण्यात आले होते. त्या सर्वांसमोर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली. या नव्या जबाबदारीने थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढण्याचे सांगितले जाते. राज्यातील या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना काल दिल्लीत पाचारण केले. सर्वांशी चर्चा केल्यानंतर समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला. थोरात यांनीही उत्साहाने नवी जबाबदारी स्वीकारत आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. नंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळाली.

Protected Content