ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी; रोहिणी खडसे यांचे निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते, परंतु सतत पडत असणाऱ्या संततधार पावसाने या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थीक मदत देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिक चांगले बहरल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली. परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे कपाशी पिकांवर बोंडअळी, मर, लाल्या इ. रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत. यामुळे कापुस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

तसेच काढणीला आलेले सोयाबिन, मका, उडीद, मुग, भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान होऊन जमीनदोस्त झालेले आहेत. सोयाबिन, मका यांना कोंब फुटले आहेत काही मंडळात गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापून टाकलेला मका,सोयाबिन वाहून गेले आहे. सुरवातीला पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकरी बांधवानी पिकांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला आहे, परंतु ओल्या दुष्काळाच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी भरीव स्वरूपात आर्थिक मदत करून शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे शेतात उभ्या असलेल्या मका सोयाबिन कापुस उडीद मुग भुईमूग आदी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी बांधवाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन लाखोंचा खर्च करून शेत शिवारात पिक उभे केले होते. परंतु आता काढणीला आलेले पिक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आधीच हमीभावाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलुन आचारसंहिता लागण्यापुर्वी सरसकट हेक्टरी भरीव आर्थिक मदत देऊन शेतकरी बांधवांना या संकटातुन बाहेर काढावे असे सांगितले.

यावेळी बोदवड बाजार समितीचे संचालक अंकुश चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस प्रविण दामोधरे ,तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे उपस्थित होते

Protected Content