नेपाळ बस अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत !- मुख्यमंत्र्यांची घोषणा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेपाळ येथील बस अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते जळगाव येथे आयोजित लखपती दीदी या कार्यक्रमात बोलत होते.

यासंदर्भातील वृत्त असे की वरणगाव, तळवेल तसेच परिसरातील भाविक हे नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून अजून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच एक तरुणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून तिचा शोध देखील सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी स्वतः नेपाळमध्ये जाऊन मदत कार्यात सहभाग घेतला. तसेच त्यांच्या पाठपुराव्याने आणि नेपाळ सरकारच्या मदतीने या अपघातामध्ये मयत झालेल्या सर्वच्या सर्व २५ जणांचे मृतदेह काल रात्री उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी या अपघातामध्ये मयत झालेल्या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर आता राज्य सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी या कार्यक्रमात नेपाळमधील बस अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे आता केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील अपघातातील मयतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

Protected Content