पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत निवेदन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करणे बाबत पाडळसे धरण जन आंदोलन समिती जळगाव येथे येऊन देशाच्या पंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छित होती मात्र पोलीस प्रशासनाने समिती पदाधिकाऱ्यांना जळगाव येथे न येण्याची विनंती केली आहे तर केंद्रीय मंत्री ना. रक्षा खडसे,खा. स्मिता वाघ यांनी लोकप्रतिनिधी नात्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधावे असे आवाहन पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे निवेदन पाठवून करण्यात आले आहे.

पाडळसे धरण व्हावे यासाठी दोन दशकांपासून आंदोलन करणारी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या होणाऱ्या दौऱ्या प्रसंगी येऊ नये यासाठी अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पाडासरे धरण जन आंदोलन समितीच्या कार्यालयात सुभाष चौधरी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाच्यावतीने अशा प्रकारची विनंती केली. या पार्श्वभूमीवर समितीतर्फे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार व केंद्रीय मंत्री यांना तातडीने पत्रव्यवहार केला.लोकप्रतिनिधी या नात्याने निम्न तापी प्रकल्पाचे गांभीर्य व अत्यावश्यकता पंतप्रधानांच्या समोर मांडावी व केंद्राच्या भरघोस निधीतून या धरणाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रसिद्धीप्रमुख रणजित शिंदे यांनी ई-मेल पाठवून तातडीने केले आहे.निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या सर्व प्रकारच्या मान्यता, तांत्रिक मंजूरी या राज्यशासनाकडून व केंद्राकडून पूर्ण झालेल्या असून दोन दशकांपासून रखडलेल्या पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होण्यासाठी यांच्याकडे सदर प्रश्नाकडे देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील तापी नदीवरील १९९९ पासून रखडलेले निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण याची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता ४८९० कोटी रुपयांची मिळाली असून सदर धरणाचे काम टप्पा एक व टप्पा दोन या पद्धतीने करण्यात येणार आहे टप्पा एक मध्ये १७ टीएमसी पैकी १०.०४ टि.एम.सी पाणी अडविण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे तर टप्पा दोन मध्ये उर्वरित पाणी साठा करण्यात येणार आहे. सदर धरणामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर , चोपडा, पारोळा ,धरणगाव तर धुळे जिल्ह्यातील धुळे ,शिंदखेडा या सहा तालुक्यांतील ४३६०० हेक्टर क्षेत्रला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. तर परिसरातील औद्योगिक विकास व उद्योग व्यवसायासाठी देखील पाणी उपलब्ध होणार आहे.

सदरच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना देखील रवाना करण्यात आलेले आहेत. निवेदनावर रामराव पवार, हेमंत भांडारकर, सुनील पाटील, महेश पाटील, गोकुळ पाटील, हिरामण कंखरे, डी के पाटील ,रवींद्र पाटील, देविदास देसले, सौ प्रतिभा पाटील, सौ वसुंधरा लांडगे, ऍड.तिलोत्तमा पाटील, पुरुषोत्तम शेटे, प्रशांत भदाणे, प्रवीण संदानशीव आदि पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Protected Content