नवाब मलिक यांची सोशल मीडियावरील पोस्टाने भूमिका स्पष्ट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या स्वतंत्रता दिवसानिमित्त माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तुरुंगातून जामीनावर बाहेर असलेले नवाब मलिक शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजित पवार यांच्या सोबत जाणार ? याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामुळे नवाब मलिक यांच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर नवाब मलिक यांनीच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वतंत्रता दिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह वापरत त्यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे एका अर्थाने जाहीर केले आहे.

अंडरवर्ल्ड क्षेत्रातील लोकांशी व्यवहार केल्याने नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता. राष्ट्रवादीतील बंडानंतर नवाब मलिक यांनी उघडपणे भू्मिका घेण्याचे टाळले होते. पण सुटकेच्या आशेने त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने होता. अजित पवारांनी शब्द टाकल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. कारण आधी वैद्यकीय कारणावरून जामिनाला विरोध करणाऱ्या ’ईडी’चा विरोध नंतर मावळला होता.

जामिनानंतर सहा महिने मलिक प्रसिद्धीपासून दूरच होते. गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. मलिक सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या बाकांवर बसले. ही बाब भाजपला रुचली नाही. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पत्र पाठविले. त्यात ‘नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत हे पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मलिक यांना महायुतीची दारे बंद झाली आहेत. यामुळेच बहुधा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलिक यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रवाहातील राजकारणापासून लांब राहिलेल्या नवाब मलिक यांनी त्यांच्या शुभेच्छा पत्रावर राष्ट्रवादीचं अधिकृत पक्षचिन्ह असलेल्या घड्याळ चिन्हाचा वापर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते अजित पवार गटात जातायत की काय या चर्चेला आता जोर येऊ लागला आहे.

Protected Content