नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (आयएएस) परीक्षेची तयारी करणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत कोचिंग क्लासेसना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की कोचिंग क्लासेसमध्ये जोपर्यंत सुरक्षा मानकांची व उपाय योजनांची खात्री होत नाही तोपर्यंत केवळ क्लासेसनी शिकवणी वर्ग ऑनलाइन घ्यावेत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
दिल्लीत आयएएस कोचिंग क्लासमध्ये तळघरात अचानक पाणी आल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या बाबत न्यायालयाने स्वत:हून दखल घेत निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील कोचिंग सेंटर्समध्ये देशाच्या विविध भागांतून केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या जीवाशी खेळले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच क्लासमध्ये सुरक्षा नियमावलीचे पालन कसे करावे या बाबत देखील उत्तर मागितले आहे. दिल्लीत झालेली ही घटना डोळे उघडणारी आहे, असे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही आस्थापनेने सुरक्षा नियमांचे पालन केले नाही तर ते चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये. या कोचिंग सेंटर्समध्ये देशाच्या विविध भागातून विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. मात्र, कोचिंग क्लासेस येथे येणाऱ्या उमेदवारांच्या जिवाशी खेळत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व कोचिंग इन्स्टिट्यूटना आग प्रतिरोधक यंत्रणा व सुरक्षेचे सर्व नियम पाळावे लागतील. दिल्ली मास्टर प्लान २०२१ नुसार सर्व सुरक्षा मानकांची पूर्तता केली गेली पाहिजे.
याशिवाय, जोपर्यंत या सुरक्षा मानकांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत या कोचिंग संस्थांनी केवळ ऑनलाइन वर्ग चालवावेत. हे क्लासेस तरुणांचा जीव धोक्यात घालू शकत नाहीत. क्लासमधून सुरक्षित बाहेर पाडण्यासाठी एक्जिट दरवाजा, हवेशीर क्लासरूम व परिसर, योग्य प्रकाश व्यवस्था, अग्निविरोधी यंत्रणा आदी सुरक्षा उपाय योजना करण्यात याव्या असेही कोर्टाने म्हटलं आहे.