अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी यांच्यावतीने 28 जुन 2024 रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात आझाद मैदान ते विधान भवन पर्यंत विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन युनियनचे राज्याध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू, सरचिटणीस गिरीश दाभाडकर, कार्याध्यक्ष काझी अल्लाउद्दीन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी हा शासनाचा शेवटचा कर्मचारी म्हणून त्याची गणना केली जाते. मात्र वर्षानुवर्षे त्याची शासनामार्फत ऊपेक्षाच करण्यात आलेली आहे. तरी त्या संदर्भात मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. मोर्चात प्रामुख्याने सदर मागण्या मंजूर करण्यास भाग पाडण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या अनुदानाची 19 महिन्यांची थकीत रक्कम मिळण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्या निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफ) या कार्यालयात जमा करणे बाबत, वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करणेबाबत, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणा नुसार भरती करत असताना दरवर्षी रिक्त पदांवर अनुकंपा धरतीवर भरती करण्याबाबत इत्यादी मागण्यांचे निवेदन ग्रामविकास विभागाला देण्यात येणार आहे.
सदर मोर्चाच्या आयोजनासाठी अमळनेर तालुका एनजीपी शाखेतर्फे पंचायत समिती अंमळनेर येथील सभागृहात तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली असता या मोर्चात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई येथील आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा सचिव प्रदीप महाजन यांनी केले आहे.