प्रकाश आंबेडकरांनी घेतली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आहे. यापूर्वी आंबेडकर यांनी हाके यांची फोनवरून विचारपूस केली होती. मात्र गुरुवारी ते थेट लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी त्यांनी हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या विनंतीनंतर दोघांनीही पाणी घेतले. यावेळी राज्य सरकार हाके यांच्या उपोषणाबाबत गंभीर नसल्याचे म्हणत आंबेडकर यांनी टीका केली आहे. भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”पाणी प्यायला हरकत नाही. त्यांनी पाणी पिले पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणी गांभीर्याने घेत नाही. भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळं असलं पाहिजे”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तसेच पुढे ते म्हणाले, ”मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते. मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे”, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content