विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून दोन नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहे. केंद्रीय पातळीवरुन त्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव तर सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् मुंबई अध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याच्या पातळीवर पक्षीय संघटनेत मोठे बदल करण्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्रात आता काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कंबर कसली आहे. अमित शाह यांचे विश्वासू आणि अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देणारे भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे विश्वासू रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी नेमण्यात आले आहे. ही जोडी मध्य प्रदेश विधानसभेत प्रभारी अन् सप्रभारी होती. त्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेत भाजपला दणदणती बहुमत मिळाले होते.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्रात 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 22 ठिकाणी विजय मिळवला होता. या निवडणुकीत ही संख्या 9 वर गेली आहे. राज्यात 13 जागांवर भाजप पराभूत झाला आहे. पक्षासाठी हा मोठा सेटबॅक आहे. यामुळे आता प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कामगिरीचे मुल्यमापन भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव करणार आहे. गरज पडल्यास संघटनेत मोठे फेरबदल करणार आहे. यामुळे भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईला नवीन भाजप अध्यक्ष मिळू शकतो.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. 2013 पासून ते हे काम करत आहेत. 2013 मध्ये त्यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणून भूमिका बजावली आणि तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक मोठ्या राज्यात त्यांनी पक्षाला प्रभावीपणे यश मिळवून दिले. 2014 मध्ये झारखंडमध्ये सहप्रभारी आणि त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रभारी. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही ते प्रभारी होते आणि शिवसेनेशी समन्वय साधून त्यांनी युतीला स्पष्ट बहुमतापर्यंत नेले. परंतु निकालानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपत मुख्यमंत्रीपदासाठी वाद झाले आणि युती तुटली. त्यानंतर 2020 मध्ये बिहारमध्येही भाजपने नितीशसोबत निवडणूक लढवली आणि युती जिंकली. त्यावेळीही निवडणूक प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव होते.

Protected Content