चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चारित्राचा संशयावरून नराधम पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी ५ मे रोजी १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.भारताबाई कैलास गायकवाड वय-३३, रा. रोहिणी ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/06/advt-aaj.jpg)
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी असलेले भारताबाई कैलास गायकवाड या विवाहिता आपल्या पती कैलास एकनाथ गायकवाड (वय-३८) आणि मुलगी योगिता यांच्यासह कामाच्या निमित्ताने चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे वास्तव्याला होत्या. कैलास गायकवाड हा नेहमी पत्नी भारताबाई यांच्यावर चरित्र्याचा संशय घेत होता, त्यामुळे त्यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण होत होता. तसेच विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान रविवारी ५ मे रोजी रात्री १२.३० वाजता भारताबाई गायकवाड आणि त्यांचे मुलगी योगिता गायकवाड हे दोघे घरात झोपलेले असताना आरोपी कैलास गायकवाड याने भारताबाई यांच्या डोक्यात दगड टाकून निर्घृणपणे खून केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि विभागीय पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ गणेश माळी यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी कैलास एकनाथ गायकवाड वय-३८, रा. रोहिणी ता. चाळीसगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कैलास गायकवाड याला अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहे.