मोदी सरकारच्या चुकीमुळे झाला पुलवामा हल्ला : मलिकांच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा येथील हल्ला झाल्याचा सनसनाटी आरोप तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी लावल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. याच प्रकरणी तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केलेल्या दावाने राजकीय वर्तुख हादरले आहे.

पुलवामा हल्ला घडला तेव्हा जम्मू-काश्मीरचं राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी ‘वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या दाव्याने वातावरण तापले आहे. सीआरपीएफनं जवानांसाठी एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. कसंही करून दिलं असतं. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर सत्यपाल मलीक हे संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते. याप्रसंगी ते म्हणाले की, मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा, असं सत्यपाल मलिक म्हणाले. हा व्हिडीओ कॉंग्रेसने शेअर करत मोदी सरकारवर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात ४० जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळालं असतं, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणं अपेक्षित होतं. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलंच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला असल्याचे यात म्हटले आहे.

सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जाऊ शकतं. याआधीही सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं होतं. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत मोदींची भेट घेतली असता त्यांच्याशी पुढच्या पाच मिनिटांत आपले भांडण झाले असं सत्यपाल मलिक म्हणाले होते.

Protected Content