
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५२ खासदारच निवडून आले असले, तरी लोकसभेत भाजपाला घेरण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी आपण पुरेसे असल्याचे सांगत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांमध्ये जोश भरला. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज झाली. यावेळी राहुल बोलत होते. यावेळी, संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांचीच पुन्हा एकमताने निवड करण्यात आलीय.
यावेळी राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना म्हणाले की, ‘आपण सर्व जण संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहोत, त्यामुळे इंच इंच लढवा, असे सांगत खासदारांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. संविधानाच्या रक्षणासाठी कुठलाही भेदभाव न करता आपल्याला लढायचे आहे. प्रत्येक देशवासीयाच्या हितासाठी उभे राहायचे आहे’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी खासदारांना ताकद दिली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केले. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसला मतदान करणाऱ्या १२. १३ कोटी मतदारांचे मी आभार मानते. या मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला. सोनिया गांधी यांनी भाषणात राहुल गांधी यांचे देखील कौतुक केले.



