भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पियुष कॉलनी आणि तुकाराम नगरात भर दिवसा चार घरे फोडून सुमारे १५ तोळे सोने आणि ११ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तापी पब्लीक स्कूलच्या मागील बाजूला असणार्या पीयूष कॉलनीतील रहिवासी मनोज भास्कर कोल्हे हे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या कुटुंबासह मंदिरात गेले होते. सव्वाचार वाजता ते घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि पाच हजार रूपये रोख असा मुद्देमाल लांबवल्याचे कोल्हे यांनी पोलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड, हरीश भोये, सचिन चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी केली.
यासोबतच चोरट्यांनी साईजीवन फ्लॉट फेज २ मध्ये अपार्टमेंटमधील रहिवासी चंद्रशेखर विश्वकर्मा, गणपत पांडुरंग ठाकूर व भरत विठ्ठल कोळी यांचे बंद घर फोडले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.