भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणारी कार निंबाच्या झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, एकाडॉक्टरांच्या वाहनावर चालक असलेला किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा ) हा पळासखेडा येथे लग्नाला वाहन घेऊन आला होता. यात बिदाईला उशीर असल्याने तेवढ्या वेळेत नातेवाइकांना भेटण्यासाठी तो पवन इंदल .राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण), जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) यांच्यासह जात होता.
या अनुषंगाने पळासखेडा (ता.भडगाव) येथून एम.एच.१९, सी.एफ. १८०३ या क्रमांकाच्या कारने किसन राठोड, पवन राठोड व जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे जात होते. समोरून येणार्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव वेगाने धावणारी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळली. यात किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा,), पवन इंदल .राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण) आणि जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) हे तिघे जबर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, कार अपघातातील तिन्ही आप्तांच्या आक्रोशाने रूग्णालयाच्या परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते. याबाबत भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर हे करत आहे.