अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात स्वत: माहिती देत त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून राधाकृष्णही भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अगदी १२ एप्रिल रोजी नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपपासून काही अंतर राखले होते. तसेच येत्या तीन-चार दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला होता. परंतू याबाबत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेशाच्या चर्चेत तथ्य नसून पूर्वीही अशा चर्चा होत राहिल्या असल्याचे सांगितले आहे. मात्र राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना विखे गैरहजर होते. आता तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. तो काँग्रेसने स्वीकारला देखील आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील का?, हे बघणेच औत्सुक्याचे ठरणार आहे.