पारोळा प्रतिनिधी । शहरातील रहिवासी राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पक्षांच्या पाण्यासाठी परळ व अन्नासाठी तांदुळ वाटपाचा उपक्रम अनेक वर्षापासुन घेत असुन शेतात जाणारे गुराखी यांना वाटप करतात. त्याचाच एक भाग म्हणुन आज तहसिल कार्यालय पारोळ्याच्या एैसपैस इमारतीवर चारही कोपऱ्यांना पक्षांसाठी पाण्याच्या परळ व तांदुळ तहसिलदार अनिल गवांदे यांच्या हस्ते ठेवुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कपिल सदाशिव चौधरी यांनी २० किलो तांदुळ चारा म्हणुन देवुन वर्षभर या उपक्रमाला साथ देण्यासाठी हातभार लावण्याचा संकल्प केला. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून माणसाने माणसांना तर मदत करायचीच आहे पण त्या बरोबर आपल्या पर्यावरण संतुलनाची अनमोल साखळी असणाऱ्या पशुपक्षांचेही जतन , रक्षण व संवर्धन करावयाचे आहे . हे सुध्दा एक आपत्ती व्यवस्थापन आहे.
प्राण, पशु, पक्षी, किटक, जलचर हे पर्यावरण रक्षण व संतुलनाची साखळी आहेत .यातील एकही कळी नष्ट झाली तरी पर्यावरणाचा समतोल बिघडुन अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात . मागे चीन या देशाने धान्य खाते म्हणुन चिमणी हा पक्षी संपुर्ण नष्ट केला . याचा परिणाम त्यांना ४ कोटी लोकांच्या भूकबळीने भोगावा लागला . त्यासाठी पर्यावरणातील सर्वच घटकांची काळजी घ्यावी असे प्रतिपादन केले.
या वेळी बृहन महाराष्ट्र तेली समाज पारोळा तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी हे उपस्थित होते . तर कार्यालयीन शिपाई श्रीमती वंदना सरदार व चालक कैलास माळी यांनी रोज पक्षांना पाणी व चारा टाकण्याची जबाबदारी आनंदाने घेतली .