६८ हजार शेतकऱ्यांना मिळणार ७५ टक्के पिकविम्याचा लाभ; मंत्री अनिल पाटलांचा पाठपुरावा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी बांधवासाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या भूमिपुत्र आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली असून खरीप हंगाम 2023 मध्ये 75 टक्के रकमेसाठी 68 हजार 850 शेतकऱ्यांना 41 कोटी 97 लक्ष,24 हजार 104 रकमेचा पीकविमा मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली. जळगाव येथे मंत्री महोदय अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले असून सदर रक्कम ऑगस्ट अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली.अडचणीच्या वेळी महायुती शासनाने शेतकरी बांधवाना विम्याचा हा आधार दिल्याने शेतकरी बांधव सुखावले आहेत.

दरम्यान यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे की अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांनी १ रुपयामध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरलेला होता.अमळनेर तालुक्यातील आठही महसूल मंडळांना 25 % अग्रीम रक्कम 56,621 शेतकऱ्यांना 41 कोटी 50 लक्ष,41 हजार,664/- रुपये यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यावर डी.बी.टी. द्वारे थेट खात्यावर जमा झालेले आहेत.तर माहे फेब्रुवारी मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानीचे पंचनामे झालेल्या 1714 शेतकरी बांधवांच्या खात्यावर डी.बी.टी. द्वारे रक्कम सुमारे 10 कोटी 28 लक्ष,956/- रुपये खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

तसेच आता उंबरठा उत्पन्न व पिक कापणी प्रयोगाच्याअंती अमळनेर तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळातील उर्वरीत 75 % रक्कमेसाठी 55,824 शेतकरी बांधव पात्र झाले असुन त्यांच्या खात्यावर रक्कम सुमारे 36 कोटी,9 लक्ष,88 हजार,92/- रुपये ऐवढी रक्कम जमा होईल तर अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादरपुर व शेळावे बु.या दोन महसूल मंडळातील 12 हजार 826 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम सुमारे 5 कोटी 87 लक्ष,36हजार 12 /- रुपये ऐवढी रक्कम ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत ओरीएन्टल इन्शुरन्स प्रा.लि.कं. कडुन शेतकरी बांधवाच्या खात्यावर जमा होतील.म्हणजेच एकूण 68हजार 650 शेतकऱ्यांना 41 कोटी 97 लक्ष,24हजार 104 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले बँकेचे खाते आधार कार्डाशी संलग्न करुन घ्यावेत.एकंदरीत शेतकरीपुत्र असलेल्या ना. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नानी अमळनेर विधानसभा मतदार संघात खरीप पिक विमा 2023-24 या हंगामात शेतकरी बांधवांना एकूण 84.51 कोटी रुपयांचा लाभ झाला असुन ना. अनिल पाटील हे शेतकरी बांधवांच्या प्रती संवेदनशील असल्यानेच हा लाभ मिळाला आहे.सदर खरीप पिक विमा मंजुर झाल्यामुळे खोटया वल्गना करणाऱ्या विरोधकांना चपराक बसली आहे.यावरून महायुती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचेही स्पष्ट झाले आहे.याशिवाय या मदतीमुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.सदर विमा मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे, ना.गिरीष महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व विशेष करून राज्याचे कर्तव्यदक्ष मदत व पुर्नवसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांचे अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार भागवत पाटील यांनी मानले आहेत.

Protected Content