65 किमीच्या 15 कोटींच्या मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेच्या कामांना मान्यता !

जळगाव, प्रतिनिधी | पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू झालेली शेत पाणंद रस्ते योजना राज्य पातळीवर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते या नावाने सुरू झाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला असून यात जळगाव जिल्ह्यातील 65 किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातल्या शिवारातील रस्ते हे इतिहासात पहिल्यांदाच जोडले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे.

 

यासंदर्भात वृत्त असे की पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबवली यांच्या अंतर्गत एक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत होता. तिच्या मदतीने रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. योजना अतिशय यशस्वी ठरले राज्य पातळीवर याचे कौतुक करण्यात आले. राज्य सरकारने ही योजना मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना या नावाने राबवण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने 11 नोव्हेंबर 2011 रोजी मातोश्री ग्राम समृद्धी योजना कार्यान्वित करण्यात आली.

योजनेतून रस्ते मजबूत नव्हे तर डांबरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला असून एका किलोमीटरसाठी तब्बल 23 लाख 85 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शासनस्तरावरून या योजनेचा कामांना मंजुरी द्यायला सुरुवात करण्यात आली असून यासाठी जळगाव जिल्ह्यात 65 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यात अमळनेर तालुक्यातील 20 किलोमीटर 20 किमी चे रस्ते मुक्ताईनगर तालुक्‍यातील 16 किमी , जळगाव तालुक्यातील 11 , धरणगाव 15 , पारोळा 3 किलोमीटर रस्ते यांचा समावेश आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे दरम्यान मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे .

या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेत शिवार हे गावांना खऱ्या अर्थाने जोडले जाणार आहे.जिल्ह्याभरातून सुमारे 3 हजार 799 किमी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून सदर योजनेतंर्गत शेत रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यायला सुरुवात झाली असून जिल्ह्यात 65 किलो मीटरचे रस्ते मंजूर झाल्याने ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे.

Protected Content