लोकसभा निवडणूकीसाठी जळगावमधील ६ तर रावेरमधून ५ जणांची माघार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जळगाव लोकसभामधील ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात संजय एकनाथ पाटील, रोहित दिलीप निकम, लक्ष्मण गंगाराम पाटील, डॉ.प्रमोद हेमराज पाटील, संग्रामसिंह सुरेश सुर्यवंशी, प्रदीप शंकर आव्हाड यांचा समावेश आहे. तर रावेर मतदारसंघा मधून ५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. यात शेख रऊफ युसुफ, राहुलरॉय अशोक मुळे, नितीन प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम, नाजनिन शेख रमजान या पाच जणांचा समावेश असून बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव मतदार संघांसाठी २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. लोकसभा निवडणूक २०२४ चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी २१ अर्ज भरले तर रावेर साठी ११ उमेदवारांनी १८ अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत जळगांव लोकसभा मतदार संघात २५ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले होते. तसेच रावेर लोकसभा मतदार संघातून ३१ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले होते.

जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवार २६ रोजी छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात अंजली करण पाटील, मोहसिन खान, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, ईशान राठोड असे ४ उमेदवार अर्ज अवैध असल्याने ते बाद करण्यात आले. त्यामुळे २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर रावेर लोकसभा मतदार संघात रविंद्र प्रल्हादाराव पाटील, गयासुद्दीन सदरोद्दीन काझी असे २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २९ उमेदवार रावेर लोकसभा निवडणुकीसाठी वैध ठरले होते.

दोन उमेदवारांची पवार-पाटील, नावाविषयी तक्रार
सोमवार २९ रोजी माघारी दरम्यान करण संजय पवार यांनी करण संजय पाटील असे नाव वापर करण्यासाठी अर्ज दिला तर करण बाळासाहेब पाटील यांनी पाटील नावा ऐवजी करण बाळासाहेब पाटील – असे नाव वापरण्यासाठी अर्ज दिला. यामुळे दोघा उमेदवारांनी तक्रार दाखल केली असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. जळगाव मतदार संघासाठी ९५ जणांनी २०७ अर्ज नेले होते. तर रावेरसाठी ७३ निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी २०१ अर्ज मोफत नेले होते.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात दुसऱ्यावेळेस १४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १४ उमेदवार होते. तर रावेर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक २४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. यापूर्वी २०१४ तसेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २० च्यावर उमेदवार रिंगणात उतरले होते.

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदार संघात अनुक्रमे ५ते ६ लाखांचे वर भाजपचे विजयी उमेदवार मताधिक्य घेत विजयी झाले होते. तर नोटा (यापैकी कोणी नाही)या पर्यायाला १० हजाराहून अधिक मते होती. तसेच काही अपक्ष उमेदवारांना नोटा पेक्षा कमी ३ ते ६ हजार मते मिळाली होती. त्यामुळे या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी जळगाव आणि रावेर दोन्ही मतदार संघात उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका नेमका कोणाला बसणार? यावर जय-पराजयाचे समीकरण विसंबून असणार असणार आहे.

Protected Content