Home Cities जळगाव जळगाव आगारातील ५१ कर्मचारी निलंबित

जळगाव आगारातील ५१ कर्मचारी निलंबित


जळगाव प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून संपकरी हे आवाहन करूनही कामावर रूजू होत नसलेल्याने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मंगळवारी जळगाव आगारातील ५१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार, संपात सहभागी कर्मचार्‍यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याआधी जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एकूण २८१ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी ५१ कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ३३२ वर पोहचला आहे.

 

जळगाव जिल्ह्यात एकूण कार्यरत ४ हजार ४४२ कर्मचार्‍यांपैकी ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यात ८ चालक व १ वाहकाचा समावेश होता. त्यानंतर आणखी २० चालक व २० वाहक रुजू झाले आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी सेवेत रुजू झाले असले तरी बस सेवा सुरळीत झालेली नाही. दुसरीकडे मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा ईशारा दिल्यानंतरही बस कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जीव गेला तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.


Protected Content

Play sound